पुणे,दि.23 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं. दरम्यान, या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नसून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं.
अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, अशा आशयाचं ट्विट शरद पवार यांनी केलं. दरम्यान, यापूर्वी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार विधीमंडळाचे नेते आहेत. शरद पवार मोदी भेट झाली याचा अर्थ लक्षात घ्यावा, असं म्हटलं होतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असंही ते म्हणाले.
२४ तारखेपासून कोणीही सरकार बनवू शकलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केलं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.